पुणे: भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी सर्वप्रथम मानवंदना दिली. सकाळी सात वाजताच येऊन त्यांनी विजय स्तंभाला अभिवादन केले. ह्यावेळी माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर दुटप्पीपणाचा आरोप केला. मराठा समाजात आणि ओबीसी समाजात दंगली होऊ नयेत आणि एकोपा राहावा ह्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांनाच पोलिसांनी नोटीसा दिल्या. मुख्य आरोपी संभाजी भिडे, त्यांना नोटीस देखील दिलेली नाही. मराठा व ओबीसी समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी एल्गार परिषदेच्या आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने जनता भीमा कोरेगाव येथे दाखल झाली आहे. स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले आहे. प्रशासनाने नागरी सुविधा पुरवल्या आहेत. प्रकाश आंबेडकर म्हणाले कि, लोक एकत्र आहेत. सरकारकडून आलेले वक्तव्य चुकीचे आहे. गावकऱ्यांनी तीन महिन्यापूर्वी पोलीस स्टेशन ला येऊन सांगितले कि, जे गेल्या वर्षी घडले, ते पुन्हा घडणार नाही. सरकारने गावकऱ्यांचा मान राखायला पाहिजे होता. तो राखलेला नाही. मागच्या वेळी जे घडले ते बाहेरच्या लोकांनी येऊन घडवले. त्या लोकांना नोटिसा दिल्या नाहीत.








