गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नियमावली जाहीर; RTPCR चाचणी बंधनकारक…

261

रत्नागिरी, 29 ऑगस्ट : कोरोनाची दुसरी लाट (2nd Wave of Coronavirus) ओसरत आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता देखील वर्तवली जात आहे. दरम्यान गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवाला (Ganesh Utsav 2021 )सुरूवात होणार असून सरकार, त्यासाठी आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

कोकणात गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते, मुंबईतून चाकरमानी कोकणात जात असतात. या साऱ्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी जिल्हा प्रशासन सतर्क झालं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली गेली आहे. या नियमावलीनुसार दोन डोस पूर्ण न झालेल्या व्यक्तिला आता आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्हा प्रवेश करताना किमान 72 तासापूर्वीचे रिपोर्ट दाखवणे आता बंधनकारक आहे. तसेच रिपोर्ट नसल्यास जिल्हा प्रवेशापूर्वी सदर व्यक्तिची चाचणी केली जाईल. यावेळी चाचणी पॉझिटीव्ह आल्यास सदर व्यक्तिला संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जाईल. पण, दोन डोस पूर्ण झालेल्या व्यक्तिला मात्र यामधून सुट मिळाली आहे. त्यामुळे दोन डोस पूर्ण झालेल्या असल्यास जिल्ह्यात कोणत्याही चाचणीविना प्रवेश मिळणार आहे.

उत्सवकाळात कोरोना नियमांचं पालन करावे लागणार आहे. भजन, आरती, किर्तन किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही याबाबत काळजी घ्यावी लागणार आहे. गणेश आगमन आणि विसर्जन मिरवणुका काढू नयेत असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनानं केलं आहे. गणेशमूर्ती ही शासनाने नेमून दिलेल्या मानकाप्रमाणे ठेवावी लागणार आहे. गणेश विसर्जन घराजवळच करावे. शक्य असल्यास हौद, कृत्रिम तलावांचा वापर करावा. गर्दी टाळण्यासाठी नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या मार्फत मूर्ती संकलन करण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात यावी. गणेश प्रसादामध्ये सुका मेवा, पूर्ण फळ यांचा समावेश असावा असं आवाहन देखील जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

कोरोना कमी असला तरी यंदाचा गणेशोत्स निर्विघ्णपणे पूर्ण करण्याची जबाबदारी ही शासन, प्रशासन यांच्यासह सर्व सामान्यांची देखील असणार आहे.