श्रीरामपूर (जि़ अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे पुरोगामी नेते आहेत, परंतु त्यांचा पक्ष संभाजी भिडे हेच चालवितात, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. आपण आघाडीची चर्चा केवळ काँग्रेससोबत करत असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. ख्रिस्ती परिषदेसाठी प्रकाश आंबेडकर हे श्रीरामपूर येथे आले होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष नसल्याने जागा वाटप व आघाडीबाबत त्यांच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशात समांतर सरकार चालवत आहे. त्यांच्या भूमिका ह्या राज्यघटनेच्या विरोधात असतात. न्यायालयाच्या निकालापूर्वीच त्यांनी राम मंदिर उभारणीची घोषणा केल्याने ते स्पष्ट होत आहे. एससी, एसटी, ओबीसी यांना नव्या पद्धतीने मनुवादी व्यवस्थेत ते बसवू पाहत आहेत. जागा वाटपात आम्हाला १२ जागा हव्या आहेत. त्या कोणत्याही द्याव्यात. ओवेसी व एमआयएम आपल्यासोबतच राहील, असेही ते म्हणाले.