अहमदनगर : महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेला काळीमा फासणारी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे ही घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. गावातील जातीयवादी समूहाकडून चर्मकार, मातंग आणि नाभिक समाजाच्या चार तरुणांचे मुंडण करून गावातून 4 तास धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली आहे. या संबंधीचा व्हिडिओ ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांनी ट्विट केली आहे.
सविस्तर वृत्त असे की, मुलींच्या छेडछेडीचा संशय घेऊन या चार मागासवर्गीय तरुणांची धिंड काढण्यात आली. पोलिस स्थानकात कोणतीही तक्रार नसताना त्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आले. त्या ठिकाणी पोलिसांनी ह्या मागासवर्गीय तरुणांना समज दिली. त्यानंतर गावात येताच गावातल्या जातीयवादी गावगुंडांनी त्यांना जातीवर शिव्या देऊन धिंड काढली. असा आरोप दिपक केदार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्ट मध्ये केला आहे.
आजही मागासवर्गीयांना माणूस म्हणून जगू दिले जात नाही. त्यांना संशयित दृष्टीतून बघितले जाते. नव्या मुख्यमंत्र्यांच्या हिंदुत्त्वाच्या अजेंड्यात हिंदु मागासवर्गीयांच्या धिंडी निघत राहणार आहेत का? त्यांच्या संरक्षणाचे काय ते सांगा. असा सवाल उपस्थित करत ह्या घटनेचा निषेध ऑल इंडिया पँथर सेना कडून करण्यात आला आहे.
या प्रकरणाची दखल पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी घ्यावी, पोलीस असताना कायदा हातात घेण्याचं काम का केलं गेलं, याला जबाबदार असलेल्या पोलिसांचे सुद्धा निलंबन झालं पाहिजे, सर्व आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे. त्यांच्यावर अट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कार्यवाही झाली पाहिजे. चांभार म्हणून हिनवने तुमचा कार्यक्रम लावतो म्हणत त्यांना हीनवणे निंदनीय आहे. राज्य सरकारने याची दखल घ्यावी अन्यथा पँथर धडक देऊन उत्तर दिल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. असा थेट इशारा दिपक केदार यांनी दिला आहे.
तुम्ही चांभार जरी असले ना तुमचा कार्यक्रम आहे…#धक्कादायक मानवतेला काळीमा फासणारी घटना श्रीगोंदा कोळगाव येते घडली आहे. चर्मकार, मातंग आणि नाभिक समाजाच्या चार तरुणांचे मुंडण करून गावातून 4 तास धिंड काढल्याची संतापजनक घटना घडली आहे.
जाहीर निषेध! pic.twitter.com/ptbX4d7r6b— Deepak Kedar (@deepakkedardk) July 8, 2022