उद्यापासून राज्यातील कॉलेज होणार सुरू….

271

Mumbai – कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने 20 ऑक्टोबर म्हणजेच उद्यापासून कॉलेज सुरू होणार आहेत. मात्र यासाठी राज्य सरकारने काही नियम घालून दिलेले आहेत. त्या नियमांचे पालन करूनच कॉलेज सुरू करता येणार आहेत.

यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. ज्या विद्यार्थ्याचं लसीकरण पूर्ण झालेलं नसेल, अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन लेक्चर्सचा पर्याय असेल. शिवाय कोरोनासंबंधित लक्षणं आढळून आल्यास कॉलेजमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.

कॉलेजमध्ये आल्यानंतर मास्कसोबतच सोशल डिस्टन्सिंग देखील पाळावे लागणार आहे. विद्यार्थ्यांना सहा ते सात फुटाचं अंतर सोडून म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये एक बेंच सोडून बसवलं जाईल. याशिवाय कन्टेन्मेंट झोनमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कर्मचाऱ्यांना कॉलेजमध्ये येण्यास परवानगी दिली जाणार नाहीये.

राज्य सरकारने 50 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने कॉलेज, युनिर्व्हसिटी सुरू करण्याची परवानगी दिली आहे. मात्र कॉलेजमधील कोरोना परिस्थितीवरून ते सुरू करायचे की नाही? हे ठरवण्याचा हक्क मात्र स्थानिक प्रशासनाला दिला आहे. याशिवाय लसीकरणासारखे उपक्रम राबवण्याचा अधिकारही कॉलेजला आहे.