मुख्यमंत्री संतापले; पोहरादेवी गर्दीबाबत प्रशासनाला तत्काळ कारवाई करण्याचे दिले आदेश…

252

वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे झालेल्या गर्दीची दखल खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून प्रशासनाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर, संबंधितांवर जिल्हा व पोलिस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले आहेत. याशिवाय, वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना याचा अहवाल देण्यास सांगण्याच्या सूचना मुख्य सचिवांना दिल्या आहेत

गेल्या 15 दिवसांपासून प्रसारमाध्यमांपासून दूर असलेले वनमंत्री संजय राठोड पोहोरादेवी मंदिरात दर्शनाच्या निमित्ताने समोर आले. पहिल्यांदाच त्यांनी पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी आपली बाजू कॅमेऱ्यासमोर मांडली. राठोड येणार हे माहिती असल्याने तिथे सकाळपासूनच कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जमलेली होती.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, गेले वर्षभर आपण अतिशय संयमाने व निर्धाराने कोविडची लढाई लढत आहोत. आपले अनेक आरोग्य कर्मचारी, पोलिस तसेच प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जीवावर उदार होऊन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे या संपूर्ण काळात सर्व महत्वाचे धार्मिक सण आणि उत्सव नागरिकांनी शांततेत आणि शासनाने आखून दिलेल्या नियमाप्रमाणे पार पाडले. या काळात मोठमोठी धार्मिक स्थळे देखील नियमांचे पालन करीत होती आणि आता देखील मिशन बिगिन अगेनमध्ये या कार्यपद्धतीचे पालन करणे आपली जबाबदारी आहे.

मी परवाच माझ्या सोशल मीडिया लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही हे याचसाठी सांगितले कारण कोरोनाची दुसरी लाट येणे आपल्या सगळ्यांसाठी काळजीचा विषय आहे. शासन म्हणून आम्ही तयारच आहोत पण नागरिक म्हणून प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी पण आहे हे सर्वानी लक्षात ठेवावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.