Mulund : वंचित बहुजन आघाडीच्या सभेला उसळला जनसागर; मोदी सरकारच्या 48 जागा कमी करा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन.

45

Mumbai : लोकसभा निवडणुका लागणार आहेत, मोदींनी घोषणा केली आहे की, 400 पार जागा निवडून आणणार आहोत. लोकांनी ठरवलं पाहिजे की, या 400 पैकी 48 जागा या महाराष्ट्रात आहेत. 400 मधून 48 गेले की 352 राहतात. त्यामुळे 48 जागा कमी करणे ही आपली जबाबदारी आहे. त्या 48 जागा आपण कमी करूया असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले. मुलुंड येथील लोकशाही गौरव महासभेत ते बोलत होते.

उद्याच्या कालावधीत युती होईल किंवा नाही होईल हे डोक्यातून काढून टाका, युती झाली तर फार चांगलं आहे आणि नाही झाली, तर आपल्याला लढायचे आहे असेही आंबेडकर म्हणाले.

आंबेडकर म्हणाले, जेवढ्या ताकदीने आपण उतरू, तेवढ्याच ताकदीने इतर पक्ष आणि समूह जो भाजपच्या विरोधात आहे तो आपल्याला मदत केल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. विचारांची लढाई आपण उभी करतोय. आपण बघत असाल की, मोदी घराणेशाही काढत आहे आणि म्हणतात की, देशातील जनता हाच माझा परिवार आहे, मोदीना म्हणतोय की, हे तुझं म्हणणं खरं असेल, तर एक गोष्ट करून दाखव ते म्हणजे निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात जे डिक्लेरेशन दिले आहे की, माझं लग्न झालेलं आहे तेव्हा त्या महिलेला एक दिवस तरी पंतप्रधानाच्या घरात ठेव, मग आम्ही म्हणू की, तू या 140 कोटी लोकांचा बाप आहे अशी टीका त्यांनी केली.

आंबेडकर म्हणाले, मोदी कितीही वल्गना करत असले की, मी 400 जागा जिंकणार आहे. पण आतली गोष्ट सांगतो की, ते पूर्णपणे कोसळले आहेत, तो माणूस घाबरलेला आहे.

जुनागड येथील बंदरात 19 हजार कोटींचा नार्कोटीक्सचा ड्रग्स साठा सापडला. ज्याचा मालक अफगाण दाखवला की, जो फाटका आहे. आपली सत्ता गेली आणि चौकशी झाली तर आपण चौकशी केलीनाही म्हणून जेलमध्ये जाऊ शकतो या भीतीने ते लटलट कापायला लागले असल्याचे आंबेडकर म्हणाले.

महाराष्ट्राच्या राजकारणात तुम्हाला भारतीय जनता पक्षाचा झेंडा दिसतोय का? तर दिसत नाही, नाव दिसत नाही. सब कूछ मोदी के नाम अशी अवस्था या ठिकाणी आहे. म्हणून, बातम्या सुद्धा मोदीच्या नावाने आहेत, अधूनमधून राहुल गांधींना दाखवलं जातं आणि विचारलं जातं की, हा बरा की हा बरा असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेसवाल्यांना माझं सांगणं आहे की, मोदीला हरवायचे असेल, तर राहुल गांधींना पुढं करू नका, तर प्रियंकाला पुढे करा ती बरोबर त्याचे 4 – 5 वाजवत असते असा सल्लाही त्यांनी दिला.

तसेच हे सरकार लुटारुंच्या मागे जात नाही, तर फक्त दिखावा करत आहे. मार्केटिंग करण्याच्या पलीकडे यांनी काहीच केले नसल्याची टीकाही त्यांनी केली.