धक्कादायक ! पारधी समाजाच्या महिलेवर २ पोलिसांनी केला अत्याचार, राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर.

84

उस्मानाबाद : भूम येथून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका पारधी समाजाच्या महिलेवर २ पोलिसांनी अत्याचार केला असून त्यातील १ आरोपी होमगार्ड, तर दुसरा पोलीस शिपाई आहे. या घटनेची दखल वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे. प्रशासन आणि सरकारच्या नाकर्तेपणाचा फटका सामान्य जनतेला बसतोय. गृहमंत्र्यांचे हे सपशेल अपयश आहे. आरोपींना कठोर शिक्षा केली जावी. राज्यात महिला सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर होत चाललाय, हे स्पष्ट होतं असल्याचा घणाघात प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या “एक्स” अकाऊंट वरील पोस्ट मधून केला आहे.

प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या पोस्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला ऊसतोड मजूर असून ती तिच्या मुलांना भेटायला बार्शी येथे जात असतांना बस स्टँडवर आरोपींनी पीडित आणि तिचा दिर थांबले असतांना त्यांना ‘चोर’ असल्याच्या संशयावरून गाडीत बसवून नेले आणि पैशांची मागणी केली. पीडित महिलेने ऊसतोड मुकादमाकडून उसने पैसे घेऊन आरोपी पोलिसांच्या मोबाईलवर पैसे दिले. यानंतर पुन्हा आरोपी पोलिसाने महिलेला दमदाटी करून महिलेवर अत्याचार केला आणि पीडितेला धमकावले.

या घटनेवरून राज्याच्या कायद्या आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला असून एकीकडे खुलेआम पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो, तर दुसरीकडे कायद्याचे रक्षकच भक्षक होतात. असा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

या सर्व प्रकरणी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने पीडित महिलेची भेट घेऊन त्यांना धीर दिला. ‘वंचित’चे नेते अरुण जाधव यांनी हे प्रकरण लावून धरले असल्याची माहिती प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या पोस्ट मध्ये दिली आहे.