प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीला थेट इशारा; राजकीय वर्तुळात खळबळ. 

36

अमरावती : महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत आमचा समावेश करा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी वारंवार केली आहे. मात्र अद्यापही महाविकास आघाडीत त्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी आज थेट महाविकास आघाडीला निर्वाणीचा इशारा दिला आहे. आम्हाला महाविकास आघाडीत घ्या, नाही तर निवडणुकीत तुम्हालाही गाडू, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या या इशाऱ्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

प्रकाश आंबेडकर यांची अमरावतीत भव्य सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. महाविकास आघाडीचे सरकार जाऊन दोन वर्षे झाले पण यांच्यात अजूनही समझोता झालेला नाही. जागा वाटप झालं नाही. त्यामुळे मला संशय वाटत आहे. यांना खरंच भाजप आणि मोदींना हरवायच आहे का? हा माझा सवाल आहे. आम्हाला म्हणतात दोन जागा घ्या. यांना काय आम्हाला बळीचा बकरा करायचे आहे काय? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केला.

तुम्ही आम्हाला चर्चेत घेतलं तर आम्ही तुमच्या सोबत येऊ. पण तुम्ही आम्हाला विचारतच नसाल आणि इथल्या गरीब मराठ्यांसारखा वापर करत असाल तर ते जमणारं नाही. तसं करण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर आम्ही भाजपबरोबर तुम्हालाही गाडू, असा इशाराच आंबेडकर यांनी दिला.

तुम्ही आधी तुमच्या जागा वाटून घ्या. वाटाघाती झाली नाही तर आम्ही आमच्या 48 च्या 48 जागा लढवणार आहोत. आमची तयारी झालेली आहे. आम्ही फक्त तुमच्या निर्णयाची वाट पाहत आहोत. वंचितमधील कोणीही तुरुंगात जाणार नाही. गेले तर सोनिया गांधींपासून सगळे जेलमध्ये जातील. पण प्रश्न हा आहे की, तुम्हाला लढण्याची इच्छा आहे का? मोदींना हरवण्याची इच्छा आहे का? तुमच्या मानगुटीवर तलवार आहे. एकत्र लढले तर तलवार हटवली जाईल. आघाडी केली तर वाचाल. नाही केली तर जेलमध्ये जाल. भाजपचा कार्यक्रम हुकूमशाही पद्धतीने चालू आहे, मोदींना केवळ एकच पक्ष पाहिजे. त्यामुळेच राजकीय पक्ष वाचणं ही काळाजी गरज आहे. राष्ट्रवादी,काँग्रेस, आणि ठाकरे यांनी बसून समझौता करावा अन्यथा जेलमध्ये जावं लागेल, असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी दिला.