ठाणे महानगर पालिकेच्या रुग्णालयात एका रात्रीत तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू…

248

Thane : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड झाला आहे. कळव्याच्या या रुग्णालयात एका रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉकटर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकच रात्री 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत पावलेल्या रुग्णांमध्ये 13 रुग्ण हे आय सी यू मधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्ड मधील असल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटल मधून शेवटच्या क्षणी आल्याने, काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच या रुग्णालयामध्ये एकाच दिवशी 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती.

आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर पक्षांनी रुग्णालयात जाऊन आंदोलन केले होते, आता केवळ रात्री 10.30 पासून सकाळी 8.30 पर्यंत 17 जणांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

मात्र सिव्हील रुग्णालय बंद झाल्यापासून सर्व ठाणे जिल्ह्यातील रुग्ण इथेच येत असल्याने डॉकटर आणि वैद्यकीय यंत्रणा कमी पडत असल्याची स्थिती आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत पाडून त्या ठिकाणी देखील मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येत आहे, त्यामुळे अनेक दिवसांपासून हे रुग्णालय बंद आहे.