तारीख व वेळ ठरवा; नाना पटोलेंचे मुख्यमंत्र्यांना प्रतिआव्हान…

1079

मुंबई : गेल्या पाच वर्षांत फडणवीस सरकारने दुप्पट काम केले असून त्यावर कुठल्याही व्यासपीठावर वादविवाद करायला तयार असल्याचा खोटारडेपणा मुख्यमंत्री जाहीर सभांमधून करत आहेत. मुख्यमंत्र्यांचे हे आव्हान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रचार प्रमुख या नात्याने स्वीकारले असून आता मुख्यमंत्र्यांनी दुप्पट कामाचे क्षेत्र/खाते/विभाग सांगून चर्चेसाठी वेळ व स्थळ निश्चित करावे, असे आव्हान माजी खासदार नाना पटोले यांनी दिले.

हे आव्हान मुख्यमंत्र्यांनी न स्वीकारल्यास राज्यात ज्या ज्या ठिकाणी फडणवीसांनी महाजनादेश यात्रा आयोजित केल्या आहेत तेथेच काँग्रेसच्या वतीने “फडणवीस दामदुप्पट पर्दाफाश महामेळावे’ आयोजित करून मुख्यमंत्र्यांचा खोटारडेपणा पुराव्यानिशी जनतेसमोर मांडणार आहोत.

भाजप-सेनेचे “फसवणीस’ नावाने ओळखले जाणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाहीर सभांना संबोधित करतांना ते “फडणवीस सरकारने’ दुप्पट काम केल्याचे सांगत आहेत. मात्र, त्यांचे हे वक्तव्य म्हणजे गावोगावी फिरून भोळ्याभाबड्या जनतेला “दुप्पट सोने’ करून देतो, असे सांगून फसवणुक करणाऱ्यांची ही सुधारित आवृत्ती आहे, असा आरोप नाना पटोले यांनी केला.सर्वसामान्य जनता भूलथापांना बळी पडू शकते. मुख्यमंत्र्यांनी न केलेल्या विकासकामांचा फुगा कितीही फुगवला तरी सत्याची एक टाचणीच त्यातील हवा काढण्यास पुरेशी आहे.