पनवेल : ‘पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसलेल्या माणसाने खोटं बोलू नये. राफेलची फाईल गायब झाली, असं सांगतात. पण अनिल अंबानी यांच्या फायद्यासाठी घेतलेला हा निर्णय आता सत्यात उतरत आहे,’ असं म्हणत भारिप व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. ते पनवेल येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्ता परिवर्तन मेळाव्यात बोलत होते.
‘राफेल आणि सुखोई ही दोन्ही विमाने सारखीच आहेत. याची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. राफेलच्या नावाने जनतेची दिशाभूल केली जात आहे,’ असा आरोपही प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
एअर स्ट्राइकवरून त्यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष केले. हवाई हल्याचे गांभीर्य भाजप, पंतप्रधान आणि त्यांच्या नेत्यांनी घालवले. आंतरराष्ट्रीय मीडियाने मोठी जीवितहानी झाली नसल्याचे सांगून सरकारच्या दाव्याची चिरफाड केली आहे. पनवेल येथे हा मेळाव्यासाठी रायगड जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने लोक हजर होती.